संपादकीय:- सध्या युक्रेनमध्ये जोरदार युद्ध चालू आहे. यामुळे हजारो नागरिक व सैनिक मृत्यू पावले आहेत. भारतातील शिक्षण घेण्यासाठी गेलेले अनेक विद्यार्थी तेथे अडकून पडले आहेत. इंदापूर तालुक्यातील कालठण नंबर 2 येथील शुभम संदीप पाडुळे व अकलूज येथील कु. वैष्णवी दिलीप कदम हे दोघेही वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले विद्यार्थी तेथे अडकले आहेत.सध्या प्रसार माध्यमांत प्रसारीत केल्या जाणाऱ्या बातम्या पाहून विद्यार्थ्यांच्या जीवितास असलेला धोका पाहून त्या विद्यार्थ्यांचे पालक भयभीत झाले आहे.दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांनी राज्याचे माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशी परतण्याची विनंती केली. हर्षवर्धन पाटील यांनी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ.सुब्रह्मण्यम जयशंकर व केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सोबत व त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधत या विद्यार्थ्यांची माहिती देत विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी विनंती केली.शिवाय हर्षवर्धन पाटील यांचे कार्यालय सातत्याने या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे.शुभम पाडुळे याला युक्रेन मधून पोलांड येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात यश आले असून तो आता सुरक्षित आहे. तसेच वैष्णवी कदम ही देखील सुरक्षित असून या दोघांनाही लवकरात लवकर मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
