पुणे, दि. १६: पुणे- बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर कात्रज नवीन बोगदा ते नवले पूलदरम्यान अपघातांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने सुचविलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज घेतला. दरम्यान रस्त्याच्या बाजूच्या व्यावसायिकांनी सेवारस्ता आणि मुख्य मार्गिका यामधील दुभाजक (डिव्हायडर) तोडल्याचे आढळून आल्यास संबंधिताचा व्यवसाय परवाना रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीस पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर आदी अधिकाऱ्यांसह ‘सेव्ह लाईफ फाउंडेशन’ संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

*खेड शिवापूर ते नवले पूलदरम्यान दररोज सरासरी ३०० वाहनांवर कारवाई*
यापूर्वी झालेल्या समितीच्या निश्चित करण्यात आल्याप्रमाणे कात्रज नवीन बोगद्याच्या अलिकडे जांभूळवाडीनजीक पोलीस चौकी स्थापन करण्यात आली आहे. या रस्त्यावर २४ तास पोलीस मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून १० अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पोलीस वाहनांद्वारे गस्त घालण्यात येत असून त्याचा चांगला परिणाम झाला आहे. या टप्प्यात विविध वाहतूक नियमांचे उल्लंघनाबद्दल दररोज सरासरी ३०० वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त श्री. मगर यांनी दिली.

दरम्यान व्यवसायाला लाभ व्हावा यासाठी काही हॉटेलचालक तसेच अन्य व्यावसायिक मुख मार्गिका आणि सेवारस्ता यामधील डिव्हायडर तोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. सेवारस्त्यावरील वाहन अचानक थेट मुख्य मार्गिकेवर तसेच मार्गिकेवरील वाहन अचानक वळत असल्यामुळे अपघात होऊ शकतात. त्यामुळे या व्यावसायिकांच्या विरोधात कठोर कारवाईची शिफारस करावी. गरज पडल्यास संबंधितांचे व्यवसाय परवानेही रद्द करण्यात येतील, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

वेगमर्यादा तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना रोखून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ग्रामीण पोलीस आणि शहर वाहतूक विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे इंटरसेप्टर वाहनासाठीचा प्रस्ताव तात्काळ द्यावा. या रस्त्यावर प्रत्येक मार्गिकेमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आलेले असून ते पोलीस विभागाच्या सॉफ्टवेअरशी जोडावेत, जेणेकरुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करता येईल, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

*जड वाहनांची वेगमर्यादा ४० कि.मी. प्रतितास करणार*
कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान अपघात टाळण्याच्या अनुषंगाने जड वाहनांसाठी वेगमर्यादा ६० कि.मी. वरुन ४० कि.मी. प्रतितास इतकी घटवण्याची अधिसूचना तात्काळ काढण्याचे निश्चित करण्यात आले. खेड शिवापूर पथकर प्लाझा येथे सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवरुन वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी सतत उद्घोषणा करण्यात यावी, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.

विविध यंत्रणांनी सुचविलेल्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या रस्त्यावर ब्रेक निकामी झालेल्या वाहनांना रस्त्यावरुन बाजूला जाण्यासाठी इमर्जन्सी एस्केप प्लॅनअंतर्गत बाहेर पडण्याचे ठिकाण (एक्झिट रॅम्प) तयार करण्याबाबत पाहणी केली असल्याचे एनएचएआयचे प्रकल्प संचालक श्री. कदम यांनी सांगितले. याबाबत आवश्यक तो अभ्यास करुन तात्काळ प्रस्तावाला संबंधित यंत्रणेची मान्यता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले.

*शासकीय कार्यालयांमध्ये हेल्मेटबाबत जनजागृती*
सर्व शासकीय कार्यालयात दुचाकीने येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी परिवहन विभाग तसेच पोलीसांनी संयुक्तपणे जनजागृती करावी. ‘एक दिवस डोक्यासाठी’ अशा स्वरुपाची मोहीम राबवत हेल्मेट न वापरणाऱ्यांचे प्रबोधन तसेच दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. हेल्मेटचे महत्व पटवून देण्यासाठी मास्टर ट्रेनर्स तयार करावेत, असेही ते म्हणाले.

यावेळी अहमदनगर रस्त्यावरील अपघात रोखण्याच्यादृष्टीने उपाययोजनांबाबतही चर्चा करण्यात आली. या रस्त्यावरील अपघाताची ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) निश्चित करण्यात आली असून उपाययोजनांविषयी कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!